सांगोल्यात मशाल विरूद्ध धनुष्यबाण; दिपकआबा साळुंखे-पाटील यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश
सांगोल्यात महाविकास आघाडीचे गणित बिघडणार


सांगोला : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी महायुतीला सोलापूर जिल्ह्यात धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपक आबा साळुंखे पाटील शुक्रवार (दि.१८) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अजित पवारांची साथ सोडलेले सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचा उद्या दुपारी तीन वाजता मातोश्री येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. यामुळे सांगोल्यात महाविकास आघाडीचे गणित बिघडणार आहे. सांगोला हा पारंपारिक शेतकरी पक्षाचा बालेकिल्ला असून आता उद्धव ठाकरे गटाने या जागेवर हक्क सांगत दीपकआबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्ष बंड करण्याच्या तयारीत असणार आहे. जर महाविकास आघाडीने अन्याय केला तर आम्ही सांगोल्यात लाल बावटा फडकाऊ असा इशारा शेकापच्या अनिकेत देशमुख यांनी दिला होता.
शिवसेनेचे स्टार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात आता त्यांचेच गेल्या वेळचे सहकारी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. दीपक आबा साळुंखे पाटील हे अजित पवार यांची साथ सोडून आता उद्धव ठाकरे यांची मशाल हातात धरणार आहेत. उद्या मातोश्री येथे दुपारी तीन वाजता दीपक साळुंखे पाटील यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होत असून यासाठी सांगोल्यातून 200 पेक्षा जास्त गाड्या घेऊन साळुंखे यांचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता सांगोल्यामध्ये शहाजी बापूंच्या विरोधात दीपक आबा साळुंखे पाटील अशी लढत दिसण्याची शक्यता असून शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई रंगतदार असणार आहे.
यामुळे महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होत असून गेले साठ वर्षापेक्षा जास्त काळ शेकापचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या सांगोला विधानसभा मतदारसंघात यावेळी उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरणार आहे. याच मतदारसंघातून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी तब्बल 55 वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत दीपक आबा साळुंखे पाटील यांना तिकीट डावल्याने त्यांनी ऐनवेळी महायुतीचे शहाजीबापू पाटील यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत शहाजी बापू हे केवळ 768 मतांनी विजयी झाले होते. आता दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे.